राष्ट्रसंत से राष्ट्रपिता संकल्पयात्रा आजपासून

Date:

नागपूर- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामविकास, ग्रामोद्धार आणि स्वावलंबनाचा मूलमंत्र समाजाला दिला. तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वच्छता, स्वदेशी आणि गावातून विकासाचा मंत्र देत विदर्भाच्या भूमीतून स्वराज्याच्या अहिंसक यज्ञाला सुरुवात केली. या दोन्ही महापुरुषांनी विदर्भाच्या भूमीतून मांडलेले विचार आजही समकालीन वाटतात. हाच विचारधागा केंद्रस्थानी ठेवून आज, मंगळवारपासून ‘राष्ट्रसंत ते राष्ट्रपिता’ अशी संकल्प यात्रा काढली जाणार आहे.

महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपित्याला अभिवादन करण्यासाठी गुरुकुंज मोझरी येथून या संकल्पयात्रेला सुरुवात होईल. १९ जानेवारीपर्यंत पाच दिवस निघणाऱ्या या पदयात्रेला मंगळवारी दुपारी १२ वाजता सुरुवात होईल. यावेळी केंद्रीय मंत्री मनसुखभाई मांडविया, अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या संकल्पनेतून निघणाऱ्या या यात्रेत गावा-गावांत स्वच्छता, प्लास्टिक कचऱ्यापासून साहित्य बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहेत. सोबतच जोडधंद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या विविध पर्यायांवर चिंतनही केले जाणार आहे. ही पदयात्रा एकूण १८ गावांमधून मार्गक्रमण करेल. यात यामध्ये स्थानिक ग्रामस्त सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, लोक प्रतिनिधी, इत्यादींचा सहभाग असेल. रात्री गावातील विश्रामस्थळी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याविषयी चिंतन सत्र, स्वच्छता, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, जलसंधारण, सिंगल वापर प्लास्टिकबंदी, अंधश्रद्धा आणि नशामुक्ती आदींवर आवाहन केले जाईल. गावातून श्रमदान, प्रभात फेरी यामधूनसुद्धा उपरोक्त संदेश दिले जातील. महात्मा गांधी, संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी यांच्या मौलिक विचारांचा प्रचार करण्यात येईल.

गांधीजींच्या निवासाने पावन झालेल्या सेवाग्राम येथे ही पदयात्रा विसर्जित होईल. ही पदयात्रा पाच दिवस, चार रात्री वाटचाल करणार आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, अभिनेत्री अलका कुबल, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार, खासदार रामदास तडस समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

महात्मा गांधींनी देशाला जीवनमूल्ये दिली. सत्य अहिंसेचा मार्ग शिकविला; सहिष्णुता शिकविली आणि सोबतच स्वच्छतेचा मंत्रही दिला जो आजही संयुक्तिक आहे. तर तुकडोजी महाराजांनी ग्रामोद्धाराचा मूलमंत्र दिला. या दोन्ही महापुरुषांच्या मूल्यांची जपणूक आणि संवर्धन करतानाच आपल्यालाही आपल्या अंगी ही मूल्ये रुजविता यावीत म्हणून ही पदयात्रा, निघणार आहे, असे खासदार डॉ. महात्मे यांनी साधलेल्या संवादात नमूद केले.

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related