विधानसभा निवडणुकीत विजय आमचाच!

Date:

मुंबई : ‘काँग्रेसमध्ये कोणी नेताच दिसत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकूणच विरोधी आघाडीचे नेतृत्व करताना दिसत आहेत. शरद पवार यांना त्यांचा पराभव समोर दिसत असल्यानेच त्यांचा प्रचारात तोल ढासळलेला दिसतो. निवडणुकीत विजय आमचाच होणार असून, आम्हाला पातळी सोडून बोलता येणार नाही’, असे सांगत, ‘विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुती दोन तृतियांशपेक्षा अधिक बहुमताने निवडून येईल’, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. त्याचवेळी, ‘शिवसेनेचा विरोध असलेला नाणार प्रकल्प कोकणातच होणार असून महिन्याभरात मी स्वतः त्याची घोषणा करणार आहे’, असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.

प्रचाराच्या धबडग्यात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी ‘मटा’शी संवाद साधला. ‘विधानसभा निवडणुकीत फार चुरस नसून काय होईल ते स्पष्टच दिसते आहे. तसेच, यावेळी कमळ या चिन्हावर मतदान होणार असल्याने आम्हाला बंडखोरीचाही फार फटका बसणार नाही. त्यामुळे राज्यात पुन्हा आम्हीच सत्ता स्थापन करणार यात मला काही अडचण वाटत नाही’, असे फडणवीस यांनी नमूद केले. या निवडणुकीत महायुतीच्या आमदारांची संख्या अभूतपूर्व असेल, तर विरोधकांची संख्या अभूतपूर्व कमी झालेली असेल, असे भाकित त्यांनी वर्तवले.

‘सेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्यास तयार’

‘लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याबाबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आम्ही सांगितले होते. परंतु कमी काळासाठी उपमुख्यमंत्रिपद नको, अशी त्यांची भूमिका होती’, असे सांगत, ‘शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्यास आम्ही तयार आहोत’, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

विधानसभा मतदान निकट आले असताना मुख्यमंत्र्यांनी ‘मटा’शी विविध विषयांवर दिलखुलास संवाद साधला…

-महाराष्ट्रातील रोजगार घटल्याची टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली आहे. त्यावर काय सांगाल?

– रोजगार निर्मितीत महाराष्ट्र आजही देशात अग्रेसर आहे. देशाच्या एकूण रोजगार निर्मितीच्या २५ टक्के रोजगार महाराष्ट्रात निर्माण होतो. देशाचा आर्थिक दर हा मुळीच नकारात्मक नाही. ५.८ टक्के हा दर आर्थिक मंदीचा नव्हे, तर हा दर जगात चांगला समजला जातो. तो ७ टक्क्यांपर्यंत जाईल, असे वाटते. जागतिक मंदीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक सुधारणा केल्या आहेत. पुढील काळात केंद्र सरकार १०० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेचा विस्तार होईल.

-शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न आहे…

– मनमोहन सिंग पंतप्रधान असताना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. तेव्हा शरद पवार हेच कृषिमंत्री होते. तेव्हा ही सर्व मंडळी सिंचनासाठी काहीही करू शकली नाही. उलट सिंचनातच मोठा घोटाळा झाला.

-भाजपचे तमाम बडे नेते प्रचारात का उतरले आहेत?

– युतीलाच यश मिळणार हे नक्की. मात्र जनतेला गृहीत धरता कामा नये. त्यामुळेच कोणताही किंतु परंतु न ठेवता पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे बडे नेते राज्याच्या प्रचारात उतरले आहेत. शिवाय याच काळात जनतेलाही राजकीय पक्षांच्या नेत्यांची मते ऐकायची असतात. प्रचारसभांच्या निमित्ताने पंतप्रधानांचे भाषण लोकांना ऐकायचे असते. त्यामुळे नेत्यांच्या सभा घेण्यात काहीच वावगे नाही.

-पवार यांच्या प्रचाराबाबत काय सांगाल?

– पवार यांना पराभवाची भिती वाटत असून त्यातूनच तोल गेल्याने ते आक्षेपार्ह हातवारे करत आहेत. पराभव समोर दिसू लागला की सदसदविवेकबुध्दी कमी होते. चीडचीड वाढते. आम्ही जिंकणारच असल्याने आम्ही आमची पातळी सोडून त्यांना उत्तर देणार नाही.

– शरद पवार यांचे राजकारण तुम्ही संपवणार का?

-कोणाचेही राजकारण असे लगेच संपत नाही. मात्र सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता आणि सत्तेसाठी काहीही असा जो काही भ्रष्ट पॅटर्न आहे तो आम्ही संपविणारच.

– मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या प्रचाराचे सूत्र काय दिसते?

– राज ठाकरे हे आता अधिक प्रॅक्टीकल झाले आहेत. राज्याची सत्ता मला द्या, असे म्हणणे प्रासंगिक ठरणार नसल्याची जाणीव झाल्याने त्यांनी मधला मार्ग शोधला असावा. राज्यात विरोधकांची विश्वासार्हता संपल्याने ते त्यांच्या जागेवर बसण्यासाठी प्रयत्नशील असावेत. मागील लोकसभा निवडणुकांमध्येच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी त्यांचा वापर करून घेत असून सर्व स्क्रिप्ट बारामतीवरून तयार होत असल्याचे आम्ही सांगतच होतो!

– नाणारला सेनेचा विरोध कायम आहे…

– नाणार रिफायनरी प्रकल्प कोकणातच होईल. जिथे लोकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळेल तिथे हा प्रकल्प होईल. महिनाभरात मी याबाबत स्वत: घोषणा करणार आहे.

-दहा रुपयांत थाळीच्या घोषणेबाबत आपले मत काय?

– दहा रुपयांत थाळी ही घोषणा शिवसेनेने आम्हाला विचारून केलेली नव्हती. मात्र त्यांनी विचार करूनच ही घोषणा केली असणार. शिवाय माझ्यावर त्यांचा विश्वासही आहे.

-मेट्रो वृक्षतोडीबाबतच्या सरकारच्या भूमिकेबाबत काय सांगाल?

– मेट्रो कारशेडबाबत राज्य सरकारने जी भूमिका घेतली आहे ती सर्वोच्च न्यायालय, हरित लवाद यांच्या आदेशानुसारच घेतलेली आहे. आरेची जागा ही जंगल ठरू शकत नाही हे स्पष्ट झाले आहे. प्रदूषण टाळण्यासाठी आधीच २३०० वृक्षांची लागवड केली आहे. शिवाय ८० दिवसातील मेट्रोच्या चार हजार फेऱ्यांमध्येच वृक्ष तोडीनंतरच्या प्रदूषणाचा प्रश्न मिटणार आहे.

-विरोधकांच्या मागे जाणूनबुजून ईडीचे शुक्लकाष्ट लावल्याचा आरोप होत आहे…

– पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनीच शिखर बँक आणि सिंचन घोटाळा यांची चौकशी लावली. त्या चौकशीचे निष्कर्ष आता येत आहेत. राज्य सहकारी बँक घोटाळ्यातील गुन्ह्यात शरद पवार यांचे नाव नोंदविण्याबाबत न्यायालयाचेच आदेश आहेत. मी या प्रकरणात जी काही माहिती घेतली त्यानुसार कर्ज माफ करण्याच्या अनेक प्रकरणांत ज्या काही बोर्ड मिटिंग्ज झाल्या, त्यातील अनेक ठरावांमध्ये शरद पवार यांच्या निर्देशानुसार, त्यांच्या पत्रानुसार कार्यवाही झाल्याचे उल्लेख आहेत. आता तपासयंत्रणाच त्यावर योग्य तो प्रकाश टाकू शकतील.

-प्रफुल पटेल यांच्या चौकशीबाबत काय सांगाल?

– न्यायालये निवडणुका पाहून वा भाजपचे ऐकून काही करत नसते. असे असताना प्रफुल पटेल यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना दोषी धरता येणार नाही, असे मनमोहन सिंग यांनी म्हणणे अत्यंत दुर्देवी आहे. मुंबई बॉम्बस्फोटात ज्या दाऊदचा हात होता, त्याच्या हस्तकासोबतच पटेल यांनी व्यवहार केल्याचे हे प्रकरण आहे.

-पाच वर्षे मुख्यमंत्रिपद सांभाळण्याचा अनुभव कसा होता?

– मी मुख्यमंत्री म्हणून राज्याला पुरेपूर न्याय दिला आहे. माझे काम पक्षाने पाहिले असून महाराष्ट्राला माझी गरज आहे हे पक्षाला माहित आहे. अर्थात, जेव्हा माझा पक्ष मला दिल्लीत काम करा, किंवा घरी बसा असा, आदेश देईल त्याक्षणी मी तो आदेश पाळेन हे मी आधीच स्पष्ट करतो.

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...