पर्यावरण रक्षणासाठी लोकचळवळ उभारणे गरजेचे : महापौर

Date:

नागपूर : वाढते प्रदूषण, वाढते तापमान यामुळे सारेच जग चिंतेत आहे. पर्यावरण रक्षणासाठी जागतिक स्तरावर पावले उचलली जात आहेत. नागपूरची ओळख ‘ग्रीन सिटी’ म्हणून असली तरी नागपुरातही पर्यावरण रक्षणासाठी लोकचळवळ उभारणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिका, ग्रीन व्हिजील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजे रघुजी भोसले नगर भवन येथे मनपा शाळांतील विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राच्या उद्‌घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर उपमहापौर दीपराज पार्डीकर, माजी महापौर प्रवीण दटके, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, सहायक शिक्षणाधिकारी कुसूम चाफलेकर, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, टीम लीडर सुरभी जैस्वाल उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, नागपूर महानगरपालिका ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या सहकार्याने पर्यावरण रक्षणात जनजागृतीचे मोठे कार्य करीत आहे. नागपूर शहरातील एक-एक झाड वाचविण्याची भूमिका महानगरपालिकेने घेतली आहे. हे कार्य केवळ जनजागृतीपुरते मर्यादित न राहता पर्यावरण रक्षण लोकचळवळ बनायला हवी. यासाठी विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देत जनजागृतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले.

सन १९७२ मध्ये स्टॉकहोम कॉन्फरन्सदरम्यान ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरले. १९७४ साली पहिल्यांदा पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. प्रत्येक वर्षी एका थीम आधारीत पर्यावरण दिवस साजरा करण्यात येतो. यावर्षी ‘बीट एअर पोल्युशन’ ही थीम असून त्यावर आधारीत मार्गदर्शन चर्चासत्रात करण्यात आले. नदी-तलावातील प्रदूषणाचे वाढते प्रमाण, स्वच्छ भारत अभियान, ऊर्जा बचत, हरित संकल्प, नैसर्गिक संपदेचे संरक्षण आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांना लहान-लहान नाटकांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विषयाबद्दलच्या विचारांचे आदानप्रदान केले. यावेळी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांनी प्रदूषण थांबविण्याची आणि नैसर्गिक संपदेचे संरक्षण करण्याची शपथ घेतली.

मनपाच्या लालबहादुर शास्त्री माध्यमिक शाळा व डॉ. राम मनोहर लोहिया माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संतोष विश्वकर्मा आणि संजय पुंड यांच्या मार्गदर्शनात शाळा परिसरात कचऱ्यापासून खतनिर्मिती केली. या खताच्या पिशव्या महापौर नंदा जिचकार आणि अन्य मान्यवरांना भेट दिल्या.

उद्‌घाटन कार्यक्रमाचे संचालन शुभांगी पोहरे यांनी केले. प्रास्ताविकातून शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर यांनी आयोजनामागील भूमिका विषद केली. चर्चासत्राचे संचालन ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनपा शिक्षण विभागाच्या सहायक शिक्षणाधिकारी श्रीमती कुसूम चाफलेकर, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, दिगांबर नागपुरे, कार्तिकी कावळे, नम्रता झवेरी, रजत जैस्वाल, रुचि सोनी, दादाराव मोहोड, इंद्रायणी ठाकरे, चिन्मय धिमान, अभिषेक वैद्य, कुणाल बोरकर, ईशा सगदेव, गौतमी ठाकरे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला मनपा शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा : Neet Result : नीट परीक्षेचा निकाल जाहीर ; सार्थक भट राज्यात पहिला

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Shop Any Item Under Rs99 !! Biggest Selling Products in India

In today’s fast-paced world, convenience is key—and that’s exactly...

AI in Digital Marketing – The Ultimate Guide

Introduction: In today's rapidly developed digital world, Artificial Intelligence...

Globallogic Inaugurates a Stem Innovation Lab in Nagpur to Advance Regional Talent

Equipping over 400 students with future-ready skills through hands-on...

Supercharge Your Customer Communication with WhatsApp Business API – Powered by EWAT

In today’s fast-paced digital world, customers expect instant communication....