पंधरा दिवसांत बुजविणार खड्डे

Date:

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा दावा; कंपनीला आकारणार दंड

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

पारडी उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे झालेले खड्डे येत्या पंधरा दिवसांत बुजविण्यात येणार असल्याची ग्वाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे. या पुलाच्या बांधकामाने गेल्या साडेचार वर्षांत पन्नासाहून अधिक अपघातबळी घेतले आहेत.

शहरातील खड्ड्यांची स्थिती आणि पारडी भागातील नागरिकांची व्यथा ‘मटा’ने प्रकाशित करताच, प्राधिकरण जागृत झाले आहे. महापालिकेचा पारडी प्रकल्प केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आला. केंद्राकडून त्यांनी तब्बल ४५० कोटी रुपये खेचून आणले. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मेट्रो रेल्वेसह पारडी पुलाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. थेट पीएमओतून लक्ष ठेवण्यात येत असलेला राज्यातील हा एकमेव प्रकल्प आहे. जड वाहतूक आणि भूसंपादनातील अडथळ्यांमुळे प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी तर काम ठप्पच असल्याचे जाणवत होते. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कंत्राटदार गॅमन टर्की (जीडीसीएल) कंपनीला आतापर्यंत अनेकवेळा नोटीस बजावली परंतु, त्याचा काही फायदा झाल्याचे दिसून येत नाही. आता दंड आकारण्याचीदेखील तयारी करण्यात आली आहे. तथापि, कंपनीला जमीन देत नाही तोपर्यंत काही करता येत नाही, असे प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले. या कामासाठी १.१८ हेक्टर जमिनीची गरज असून निम्मीच जमीन अद्याप मिळालेली नाही. महापालिकेत भाजपची सत्ता असून दिग्गज नेते पदाधिकारी आहेत. यानंतरही प्रकल्पासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्यात आलेली नाही हे विशेष

साडेचारशे कोटी रुपयांचा हा प्रकल्प चार महिन्यांपूर्वीच पूर्ण होणे अपेक्षित होते. दीड वर्ष विलंबाने पुढच्यावर्षी डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे प्राधिकरणाचे प्रयत्न आहेत. या मार्गाची लांबी ७.१ किलोमीटर असून पूल ६.४ किलोमीटर लांब आहे. आतापर्यंत सुमारे ३५ टक्के काम झाले असून कंत्राटदाराला ८० कोटी रुपये देण्यात आले आहेत.

या मार्गावर मोठ्या प्रमाणात असलेली जड वाहतूक कामात अडथळा निर्माण करणारी आहे. शहरात येणारी व बाहेर जाणारी वाहतूक याच मार्गाने होत असल्याने रस्त्याचे काम प्रभावित झाले आहे. वाहतूक वळवण्यात यावी, यासाठी प्राधिकरणाने पोलिस आयुक्तांकडेदेखील प्रयत्न करण्यात आले. परंतु, प्राधिकरणाला अपेक्षित यश आले नाही. कळमना बाजारपेठेमुळे व शहरात येणाऱ्या इतर वस्तूंमुळे वाहतूक वळवण्यात अडचण येत असल्याचे समजते. हा मार्ग तयार करण्यात आला त्यावेळी सध्याच्या वाहतुकीचा अंदाज घेण्यात आलेला नव्हता. त्याचे परिणाम कामात दिसून येत असल्याचा दावा प्राधिकरणाकडून करण्यात आला.

कामाची गती वाढवू!

‘नागरिकांची सुरक्षा आणि खड्डे बुजवण्यास सर्वाधिक प्राधान्य आहे. पावसाचा जोर ओसरल्यासारखा दिसत असून येत्या पंधरवड्यात खड्डे बुजवून मार्ग व्यवस्थित करण्यासोबतच कामाची गती वाढवण्यात येईल’, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक एन. एल. येतेकर यांनी सांगितले.

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related