Nagpur Crime: हत्या करून बालगुन्हेगाराच्या शरीराचे तुकडे

Date:

नागपूर: हिंगणा मार्गावरील मेट्रो स्टेशनमागील टेकडीवर आढळलेल्या मानवी सांगाड्याच्या रहस्यावरून पडदा उठला आहे. हत्या करून बालगुन्हेगाराच्या शरीराचे तुकडे करण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. डीएनए तपासणीचा अहवाला आला. त्यानंतर मृतकाची ओळखही पटली. सतरावर्षीय मृतक हा एमआयडीसी परिसरात राहायचा. त्याच्याविरुद्ध ११ गुन्हे दाखल आहेत.

जानेवारी २०२०मध्ये बाजारात जात असल्याचे सांगून हा बालगुन्हेगार घरून निघाला. मात्र, घरी परतला नाही. त्याच्या आईने एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. जानेवारीत टेकडीवर मानवी सांगाड्याचे तुकडे आढळले. पोलिसांनी याप्रकरणाची नोंद घेत तपास सुरू केला. तुकडे न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविले. तुकडे मानवाचे असून, त्याचे वय १२ ते १७दरम्यानचे असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला. बालगुन्हेगारही बेपत्ता असून तो १७ वर्षांचा असल्याचे पोलिसांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. एमआयडीसी पोलिसांनी डीएनए चाचणीचा निर्णय घेतला. पोलिसांनी बालगुन्हेगाराच्या आई-वडिलांचे नमुने तसेच मृताच्या हाडाचे, कवटीचे तुकडे व चार दात डीएनए तपासणीसाठी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. डीएनए सारखेच असून, नमुने मृतकाच्या आई-वडिलांचेच असल्याचे प्रयोगशाळेने ५ मे रोजी स्पष्ट केले. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

स्मार्ट पोलिसांसमोर आव्हान

हायटेक पोलिसांनी रहस्यमय ठरलेल्या एकनाथ निमगडे व मनीष श्रीवास हत्याकांडाचा पर्दाफाश केला. कोटींची सुपारी देऊन निमगडेंची हत्या करण्यात आली. मात्र, सुपारी देणाऱ्याचे नाव अद्यापही गुन्हेशाखा पोलिसांना कळू न शकल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आता बालगुन्हेगाराचा निर्घृण खून करण्यात आला. यातील मारेकरी शोधणे स्मार्ट पोलिसांसमोर आव्हान आहे.

तुकडे हत्याकांडाची दुसरी घटना

निर्दयीपणे ठार मारल्यानंतर तुकडे तुकडे करण्यात आल्याची उपराजधानीतील ही दोन वर्षांतील ही दुसरी घटना होय. ऑगस्ट २०१९ मध्ये तुकडे तुकडे करून सुधाकर देवीदास रंगारी ऊर्फ जेम्स बॉण्ड (वय ४८, रा. आवळेनगर, जरीपटका) याची हत्या करण्यात आली. तुकडे पोत्यात भरून ते गांधीसागरमध्ये फेकण्यात आले. त्यानंतर आता एमआयडीसीत हत्या करून बालगुन्हेगाराच्याही शरीराचे तुकडे करण्यात आले. या प्रकरणाचा तपासही हायटेक गुन्हेशाखेकडे जाण्याची शक्यता आहे.

सुजलचा सुगावा लावण्यात अपयश

रहस्यमय हत्याकांडाचा उलगडा करण्यात हातखंडा असलेली हायटेक गुन्हेशाखा चार वर्षांनंतरही बेपत्ता सुजल वासनिकचा सुगावा लावण्यात अपयशी ठरली. सप्टेंबर २०१७मध्ये लिहिगाव येथील सुजल बेपत्ता झाला. दहा लाखांच्या खंडणीसाठी त्याचे अपहरण झाल्याचे त्यावेळी समोर आले. याप्रकरणात सुनील मडावी व रामदास मडावी या दोघांना अटकही करण्यात आली. रामदासने पोलिस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सुजल बेपत्ता झाला त्याचदिवशी कामठी पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतली असती तर तो सापडला असता. बंदोबस्तात व्यस्त असल्याचे कारण त्यावेळी या अधिकाऱ्याने दिले. चार वर्षांनंतरही हे प्रकरण रहस्यमयच आहे. याला तत्कालीन प्रभारी अधिकाऱ्याचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे बोलले जाते.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Sitabuldi Fort to Open for Public on Republic Day 2026 – A Rare Heritage Experience in Nagpur

Nagpur is gearing up for a memorable Republic Day...

The Story of Nagpur : From Ancient Roots to Modern Orange City

Nagpur : fondly known as the Orange City of...

India vs New Zealand T20i in Orange City Nagpur Jamtha on January 21, 2026

Cricket fever is ready to grip Nagpur once again...