नागपूर: नागरिकत्व सुधारणा कायदा व देशातील नवरत्न कंपन्या विकण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीने आज, शुक्रवारी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. बंददरम्यान अनुचित घटना टाळण्यासाठी प्रशासन व पोलिस सज्ज झाले आहे.
वंचितचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बंदचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला राज्यातील सुमारे २५ संघटनांनी पाठिंबा दिला आहे. देशात एनआरसी आणि सीएए CAA विरोधात प्रचंड रोष आहे. सरकार दडपशाही करून हा कायदा लागू करू पाहत आहे. दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था तळाला गेली आहे. जीएसटी, नोटबंदी आणि गैर विश्वासाचे वातावरण यामुळे सरकारला निधी येत नाही. देशाची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू आहे. या सर्वाला सरकार जबाबदार असून त्याचा निषेध करण्यासाठीच महाराष्ट्र बंद पुकारण्यात येत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी १६ जानेवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नमूद केले. या बंदमध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.
दरम्यान, नागपूर शहर व जिल्ह्यात बंद यशस्वी व्हावा, यासाठी वंचितसह अन्य संघटनांच्या नेत्यांनी जनजागरणासाठी बैठका घेतल्या. बंदच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शहरात विधानसभा मतदारसंघनिहाय व शहराच्या कार्यकारिणीची गुरुवारी वंचितची संयुक्त बैठक झाली. यास विविध संघटनांचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. बंद दरम्यान कुणीही गोंधळ घालू नये, सर्वसामान्य व व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही तसेच, सरकारी वा खासगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. बंदला एमआयएम, गोंडवाना गणतंत्र पार्टी, आदिवासी अस्मिता, रिपब्लिकन ऑटो संघटना, नागपूर फेरीवाला दुकानदार संघ, मुस्लिम परिषद, शिवशाही व्यापारी संघासह अन्य संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. बैठकीत वंचितचे शहर अध्यक्ष रवी शेंडे, राहुल वानखेडे, प्रा. रमेश पिसे, संजय हेडाऊ, मंगलमूर्ती सोनकुसरे आदी उपस्थित होते.