नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने दोन कोटींचा आकडा पार केला आहे. भारत हा जगातील दुसरा देश आहे, जिथे दोन कोटीहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोना संसर्ग वाढीचा वेग इतका आहे की, गेल्या काही दिवसांत रुग्णांची संख्या एक कोटींवरून दोन कोटींवर गेली आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांकडून दररोज नवनवे दावे-प्रतिदावे केले जात आहे.
कोरोनामुळे फक्त फुफ्फुसाचा आजार नाही तर यामुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या देखील होऊ शकतात, असा धक्कादायक दावा तज्ज्ञांनी केला आहे. विशेष म्हणजे तुमच्या शरीरातील अवयव सुरक्षित ठेवण्यासाठी या रक्ताच्या गुठळ्या शस्त्रक्रियेद्वारे त्वरित काढणे आवश्यक असते. रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याच्या या स्थितीस डीप व्हेन थ्रोम्बोसिस (डीव्हीटी) असे म्हणतात. एका अभ्यासानुसार, सध्या कोरोना रुग्णांमध्ये डीव्हीटीची रुग्णांची टक्केवारी सुमारे 14 ते 28 टक्के आहे. तसेच, धमनी थ्रोम्बोसिसची टक्केवारी 2-5 टक्के आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, हा संसर्ग फुफ्फुसांसह रक्त पेशींशीही संबंधित आहे.
दिल्लीतील सर गंगा राम हॉस्पिटलचे वेसल अँड इनहेलेशन सर्जन डॉ. अंबरीश सात्विक म्हणाले की, आम्ही दर आठवड्याला सरासरी पाच ते सहा प्रकरणे पाहात आहोत. या आठवड्यात दररोज असा प्रकार समोर येत आहे. याचबरोबर, डॉ. सात्विक यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला ट्विट केले होते की, कोरोनामुळे रक्ताच्या गुठळ्या बनण्यासंबंधी लक्ष वेधले होते, ज्यामध्ये कोरोनाग्रस्त रूग्णाच्या अवयवाच्या धमनीत रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याचे फोटो पोस्ट केले होते. याशिवाय, दक्षिण-पश्चिम द्वारका येथील आकाश हेल्थ केअरमधील हृदय विभागाचे डॉ. अमरीश कुमार म्हणाले की, ज्यांना टाईप-टू डायबिटीज मेलीटस आहे, अशा कोरोना रुग्णांमध्ये रक्त जमा होण्याचे प्रकरण समोर येत आहे, परंतु नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
डीप व्हेन थ्रोम्बोसिस म्हणजे काय?
रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याच्या या स्थितीला डीप व्हेन थ्रोम्बोसिस (डीव्हीटी) असे म्हणतात. रुग्णाच्या शरीराच्या आतील भागातील रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी निर्माण होते, तेव्हा डीव्हीटी फार गंभीर होते. त्यावेळी धमन्यांमध्ये रक्ताची गाठ होते. आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या या हृदयापर्यंत रक्त पोहोचवतात. कोरोनाग्रस्तांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यानतंर त्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्याशिवाय स्ट्रोक आणि अवयव निकामी होऊ शकतात. हा धोका साधारण श्वसनाचा त्रास असलेल्या कोरोनाग्रस्तांना जास्त असतो. कोरोना रुग्णांच्या रक्तवाहिन्या कमजोर होतात. त्यावेळी एक प्रोटीन तयार करते. यामुळे रक्तवाहिन्यांना धोका पोहोचतो.
देशात गेल्या 24 तासांत खळबळ उडविणारा मृतांचा आकडा
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशात गेल्या 24 तासांत देशात 4,01,078 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर 3,18,609 बरे झाले आहेत. खळबळ उडविणारा आकडा हा मृतांचा आहे. देशात गेल्या 24 तासांत 4,187 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आजपर्यंत 2,18,92,676 कोरोनाबाधित साप़डले आहेत. यापैकी 1,79,30,960 बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 2,38,270 वर गेला आहे. सध्या देशात 37,23,446 रुग्ण उपचार घेत आहेत.