नागपूर : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पडल्याची चर्चा असतानाच वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच त्यांचे उमेदवार पराभूत झाल्याचा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांनी चांगली कामगिरी केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
विदर्श, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वंचितच्या उमेदवारांना घसघशीत मतं मिळाली आहेत. अनेक ठिकाणी आमचे उमेदवार विजयाच्या जवळ पोहोचले होते. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीने आमची मतं खाल्ल्याने आमचे उमेदवार पराभूत झाले. मुंबईत आम्हाला जास्त मतं खेचता आली नाही. आम्ही मुंबईत प्रचारात कमी पडलो हे खरं आहे. पण, विधानसभेत असं होणार नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आम्ही लागलो आहोत. भारिप-बहुजन महासंघ, एमआयएम आणि जनता दल मिळून वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली विधानसभा लढवेल. आम्ही महाराष्ट्रात कमीत कमी ५५ जागांवर विजय मिळवू, असंही ते म्हणाले. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्यासाठी तुमच्याशी चर्चा करणार आहेत, त्याबाबत तुमचं काय मत आहे? असा सवाल केला असता, ज्यांची नावं तुम्ही घेत आहात, त्यांची त्यांच्या पक्षात कोणीच दखल घेत नाहीत. ते आमच्याशी काय चर्चा करणार? असा प्रतिसवाल आंबेडकरांनी केला. राष्ट्रीय राजकारणात काँग्रेस मागे पडली आहे. आगामी काळातही हेच चित्र असेल. पण तरीही काँग्रेस दुसऱ्या पक्षांना पुढे येऊ देत नाही. आम्ही राष्ट्रीय राजकारणात असतो तर भाजपला नाकीनऊ आणले असते, असंही त्यांनी सांगितलं.
काँग्रेस चोरांचा पक्ष
भाजपची बी टीम म्हणून तुमच्यावर काँग्रेसकडून आरोप केला जातोय? असा प्रश्न आंबेडकरांना विचारण्यात आला. त्यावर आम्ही भाजपची बी टीम नाही. हा आमच्याबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादीने चालविलेला अपप्रचार आहे. कारण काँग्रेस स्वत:च चोरांचा पक्ष आहे. आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतही नाही आणि भाजप-शिवसेनेसोबतही नाही. या निवडणुकीतील काँग्रेसची भूमिका अत्यंत धोकादायक होती. त्यामुळेच आम्ही या निवडणुकीत आमचं अस्तित्व दाखवून दिलंय आणि येणाऱ्या निवडणुकीच्याही कामाला लागलोय, असं आंबेडकर म्हणाले.
अधिक वाचा : महापालिकेतर्फे गोरेवाडा तलाव परिसरात स्वच्छतेचा जागर, महापौरांसह स्वयंसेवी संस्थेचे तलाव परिसरात श्रमदान