केंद्राच्या योजनेत फक्त तांदूळ; केशरी कार्डधारकही लाभार्थी नाहीत: मुख्यमंत्री

Date:

मुंबई: केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजनेत फक्त तांदूळ वाटपाचा समावेश आहे. जे लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, त्यांनाच तांदूळ मिळणार असून केशरी कार्डधारकांना केंद्राने या योजनेतून वगळलं आहे, अशी माहिती देतानाच राज्य सरकारकडून मात्र मध्यमवर्गीयांनाही ८ रुपये प्रति किलो दराने तीन किलो गहू आणि १२ रुपये प्रति किलो दराने तांदूळ दिले जात आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यामुळे केंद्र सरकारने मोफत धान्य वाटप करायला सांगूनही राज्य सरकार धान्य वाटप करत नसल्याच्या भाजपच्या आरोपातील हवा निघून गेली आहे.

मुंबई आणि पुण्यात कोरनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. त्याला काल चार आठवडे पूर्ण झाले. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधत त्यांना मानसिक बळ देण्याचा प्रयत्न केला. तसेच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील नागरिकांचं त्यांनी आभार मानले. यावेळी बोलताना त्यांनी मोफत अन्नधान्य वाटपावरून होत असलेल्या भाजपच्या आरोपांमधील हवा काढून टाकली. केंद्राच्या योजनेत केवळ तांदळाचं मोफत वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे तांदळाचं वाटपही सुरू झालं आहे. मात्र केंद्राने केवळ दारिद्रयरेषेखालील लोकांनाच मोफत तांदूळ वाटप करण्यास सांगितलेलं आहे. त्यात केशरी कार्डधारकांचा समावेश नाही. त्यामुळे मध्यमवर्गीयांना या योजनेचा लाभ मिळत नाही, असं सांगतानाच केशरी कार्डधारक मध्यमवर्गीयांसाठी योजना आखण्याची विनंती पंतप्रधानांना केली आहे. त्यांच्याशी फोनवरूनही बोललो असून त्यांना पत्रही पाठवलेलं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

सर्वच जण अडचणीचा सामना करत असल्याने राज्य सरकारने केशरी कार्डधारक मध्यमवर्गीयांसाठी ८ रुपये प्रति किलो दराने तीन किलो गहू आणि १२ रुपये प्रति किलो दराने २ किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याला किमान आधारभूत किंमतीवर आणखी धान्य मिळावं म्हणून आम्ही केंद्राकडे मागणीही केली आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं. तसेच राज्यसरकार शिवभोजन योजनेतून रोज साडेपाच सहा लाख लोकांना अन्न पुरवत आहे. लोकांच्या तीनवेळच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. गरज पडल्यास आणखी व्यवस्था करू, असेही त्यांनी सांगितलं.

राज्यातील करोना रुग्णांना व्हेंटिलेटरची कमतरता भासू नये म्हणून महाराष्ट्र आणि गुजरातमधील काही कंपन्या व्हेंटिलेटर तयार करत आहेत. या कंपन्यांना व्हेंटिलेटरचं उत्पादन करण्याचा अनुभव नसला तरी त्यांच्याकडून व्हेंटिलेटर घेताना ते तपासूनच घेतलं जाईल. त्यामुळे राज्यात व्हेंटिलेटरचा प्रश्न निर्माण होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात पीपीटी किटचा तुटवडा आहे. अमेरिकेनेही आपल्याकडे मदत मागितली आहे. मात्र, असं असलं तरी आपणही पीपीटी किट तयार करण्याचं काम करत आहोत. हाही प्रश्न सुटणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

करोनानंतर आर्थिक युद्ध लढायचं आहे

करोनाविरोधातील युद्ध जिंकल्यानंतर आपल्याला आणखी एक युद्ध लढावं लागणार आहे. ते म्हणजे आर्थिक संकटाविरोधातील हे युद्ध आहे. आर्थिक संकट हे एक जागतिक युद्ध असेल. संपूर्ण जगात आर्थिक संकटावर मात करण्यासाठी चढाओढ लागलेली असेल आणि हे युद्ध सुद्धा आपण नक्कीच जिंकू असा मला विश्वास आहे. त्यामुळे या युद्धात लढण्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या फिट आणि सक्षम असणं गरजेचं आहे. त्याकरिता घरीच थांबा. घरातल्या घरात योगा करा. व्यायाम करा. मन आनंदी आणि प्रसन्न ठेवणारे कार्यक्रम पाहा. आवडत्या छंदामध्ये स्वत:ला गुंतवून घ्या, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

करोनामुळे जापानमध्ये आणीबाणी लागण्याची शक्यता आहे. सिंगापूरमध्ये लॉकडाऊन वाढवलेला आहे. मात्र, अशाही परिस्थितीत चीनच्या वुहानमध्ये लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. ही दिलासादायक बातमी आहे. तब्बल ७४-७५ दिवसानंतर हा निर्बंध उठवण्यात आला आहे. त्यामुळे हे ताणलं गेलं तर कुठपर्यंत ताणलं जाऊ शकतं हे लक्षात येतं. मात्र हे दिवसही जाणारच. आपण या युद्धात जिंकणारच. आपण हिंमतीने हे युद्ध जिंकू. त्यासाठी तुमची तंदुरुस्ती हवी, असंही ते म्हणाले. तसेच वृत्तवाहिन्यांना बातम्यांबरोबर जुने आणि हलके फुलके कार्यक्रम दाखवण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

खाण्याची पथ्य पाळा

यावेळी त्यांनी विविध व्याधींशी सामना करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाना खाण्याचे पथ्य पाळण्याचे आवाहन केलं. मी खाण्यावर निर्बंध आणणार नाही. पण ज्यांना मधूमेह, किडनीचा विकार आहे किंवा रक्तदाबाचा त्रास आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांनी खाण्याची पथ्यं पाळली पाहिजेत, असं त्यांनी सांगितलं.

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Wockhardt Hospitals Introduces Next-gen Robotic Knee Surgery in Nagpur, Empowering Patients to Walk Pain-free Again

MISSO Robotic System brings global orthopaedic technology closer to...

🎉 Black Friday 2025: The Ultimate Guide to Gadget Deals in India

As the holiday season approaches, Black Friday has evolved...

Nagpur Winter 2025: A Season of Chill, Haze & Quiet Magic

As winter unfolds across Nagpur in 2025, the city...

Merry Christmas Wishes 2025

Merry Christmas Wishes 2025 “Wishing you a very merry Christmas...