मुंबई किनारपट्टीला लवकरच मिळणार ‘ब्रह्मोस’चे कवच

Date:

नागपूर: मुंबई शहर व उपनगराच्या किनारपट्टीला लवकरच ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राचे कवच मिळणार आहे. हे क्षेपणास्त्र रडारशी संलग्न असेल. या संबंधीच्या खरेदीला अलीकडेच केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

२६/११ च्या हल्ल्यानंतर किनारपट्टीवर स्वयंचलित ओळख प्रणाली (एआयएस) लावण्याचा निर्णय झाला. त्याअंतर्गत मुंबई शहर आणि उपनगराशी संबंधित किनारपट्टीवर असे जवळपास २० एएआय बसविण्यात आले आहेत. त्याआधारे येणारी प्रत्येक बोट किंवा होडी ओळखता येते. तर खोल समुद्रातील संशयित हालचाली ओळखण्यासाठीही देशभरात एकूण ५७ रडार किनारपट्टीवर बसविण्याचा निर्णय झाला. त्यापैकी ४१ रडार सध्या बसविण्यात आले आहेत. ४१ पैकी १० रडार पश्चिम किनारपट्टीवर आहेत. त्यातील चार रडार मुंबई शहर व उपनगराच्या किनारपट्टीवर आहेत. याच रडारला आता ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र संलग्न असतील.

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली असलेल्या संरक्षण खरेदी परिषदेची (डीएसी) बैठक अलीकडेच झाली. त्यामध्ये त्यांनी ही क्षेपणास्त्र प्रणाली सर्व किनारपट्ट्यांवर बसविण्यास मंजुरी दिली. ‘नेक्स्ट जनरेशन मेरिटाइम मोबाइल कोस्टल बॅटरीज’ असे नाव असलेला हा जवळपास १३५० कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. यामध्ये किनारपट्टीवर बसविण्यात आलेल्या रडारने शत्रूचे जहाज टिपल्यास तत्काळ ‘ब्रह्मोस’ हे आवाजाच्या वेगाने मारा करणारे क्षेपणास्त्र डागले जाईल. क्षेपणास्त्राला रडारकडूनच लक्ष्याची सूचना दिली जाईल. त्यामुळे ते अचूक मारा करू शकेल.

लष्कराचे ‘ब्रह्मोस’ नौदलासाठी 

‘ब्रह्मोस’ या क्षेपणास्त्राचे जमिनीवरून, समुद्रात व हवेत मारा करणे, असे तीन प्रकार आहेत. हे तिन्ही क्षेपणास्त्र अनुक्रमे लष्कर, नौदल व हवाईदल यांच्यासाठी वापरले जाते. वरील प्रकल्पात क्षेपणास्त्राचा मारा समुद्रातील शत्रूच्या जहाजावर होणार असला तरी, हे क्षेपणास्त्र किनारपट्टीवरून डागले जाणार आहे. त्यामुळेच लष्करासाठीचे ‘ब्रह्मोस’ याअंतर्गत तैनात असेल. अशा किमान चार बॅटरीज मुंबईत तैनात असतील. या प्रत्येक बॅटरीला किमान दोन ब्रह्मोस व तीन जहाजविरोधी क्षेपणास्त्र संलग्न असतील.

रडारची क्षमता १७० किमी 

खोल समुद्रातील हालचाली टिपण्यासाठी बसविण्यात आलेल्या रडारची क्षमता १७० किमी आहे. १७० किमी अंतरापर्यंतच्या आकाशातील अथवा समुद्री पृष्ठभागावरील हालचाली हे रडार टिपू शकते. त्याचा एकूण परिघ हा तब्बल ९८ हजार चौरस किमी आहे.

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...