नागपूर: केपीवर पुन्हा सापडल्या तोफा; महिन्याभरातील दुसरी घटना

Date:

नागपूर: राज्यात राजकीय पक्षांद्वारे एकमेकांवर टीकेच्या तोफा डागल्या जात असताना कस्तुरचंद पार्कवर (केपी) गुरुवारी पुन्हा एकदा ब्रिटीशकालीन ऐतिहासिक दोन तोफ सापडल्या आहेत. महिन्याभराच्या अवधीतील ही दुसरी घटना असून प्रथमदर्शनी दोन्ही वेळी सापडलेल्या तोफ सारख्या धाटणीच्या दिसून येत आहे.

गाजलेल्या राजकीय सभांचा साक्षीदार असलेल्या कस्तूरचंद पार्कवर ऐतिहासिक अशा ब्रिटिशांच्या तोफा मिळाल्या आहेत. सध्या या मैदानावर महापालिकेद्वारे सांडपाणी वाहून जाण्यासाठी भूमिगत नाली बनविण्याचे कार्य सुरू आहे. नालीचा मार्ग खोदत असताना बुधवारी रात्री अवघ्या दोन ते तीन फुटांवर साडेनऊ फूट लांब आकाराच्या दोन तोफ सापडल्या. त्यानुसार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी राज्य पुरातत्व विभागाला कळविले. गुरुवारी सकाळी राज्य पुरातत्व विभागाची चमू आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तोफांची पाहणी केली. जेसीबी उपलब्ध नसल्याने लगेच तोफ काढण्यात आल्या नाहीत. परंतु, तोफेचा सुरुवातीच्या भागावरून यापूर्वी तोफांप्रमाणचे ब्रिटीश धाटणीच्या, वजनी असल्याचे दिसून आले. केपीवर सध्या मेट्रोच्या कार्याशिवाय मैदानाचे सौंदर्यीकरण सुरू आहे. याचअंतर्गत मैदानावर साचणारे पाणी वाहून जाण्यासाठी भूमिगत नाला तयार करण्यात येत आहे. त्याच कामांतर्गत सर्वात आधी १७ ऑक्टोबर २०१९ रोजी चार तोफ आणि दोन मॉर्टल सापडले होते. त्या तोफांवर नमूद असलेल्या इंग्रजीतील ‘आर’ अक्षर आणि इंग्लडच्या राणीच्या मुकुटाच्या आकाराच्या चित्रावरून त्या रॉयल गन फॅक्टरीत तयार झालेल्या असाव्यात असा, अंदाज व्यक्त करण्यात आला होता. महिन्याभराचा कालावधी लोटत नाही तोच पुन्हा एकदा दोन तोफ सापडल्याने नागपुरकांनी हा ऐतिहासिक वारसा पाहण्याची, जपण्याची भावना व्यक्त केली आहे.

तोफांसह मिळू शकतात भरमार बंदुका!

नागपूरकर भोसले आणि ब्रिटिशांमध्ये १८१७-१८दरम्यान झालेल्या युद्धात वापरण्यात आलेल्या या तोफा आहेत. त्याकाळी लांब पल्ल्याच्या आणि कमी पल्ल्याच्या अशा दोन प्रकारच्या तोफा वापरल्या गेल्या. मैदानाचे योग्यरीत्या उत्खनन झाल्यास अजून काही तोफा, भरमार बंदुका आणि इतर शस्त्रे मिळू शकतात. हा संपूर्ण वारसा ऐतिहासिक माहितीसह सर्वसामान्यांसाठी खुला करायला हवा, असे मत पुरातत्वच्या जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

‘केपी’चे व्हावे वैज्ञानिक उत्खनन

कस्तूरचंद पार्क ही युद्धभूमी होती. तिथे सीताबर्डीचे युद्ध झाले. त्याकाळी ठासणीच्या बंदुका वापरल्या जात. बंदुकीच्या नळीत दारू भरल्या जात असे. त्यानंतर मागच्या बाजूने फ्लिंटच्या दगडातून तयार झालेल्या ठिणगीद्वारे आग लावली जायची. त्या काळातील फ्लिंटचे दगड आता-आतापर्यंत भेटायचे. २०१७मध्ये सीताबर्डीच्या युद्धाला दोनशे वर्षे पूर्ण झाली तेव्हा ‘केपी’चे वैज्ञानिक पद्धतीने उत्खनन करण्याची मागणी झाली. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. उत्खनन झाल्यास अनेक ऐतिहासिक गोष्टी तिथे मिळू शकतील, असा दावा करण्यात येत आहे. दुसऱ्यांदा तोफ सापडल्यामुळे पुन्हा एकदा उत्खननाची मागणी जोर पकडू लागली आहे.

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related