एनडीएला बिहारमध्ये स्पष्ट बहुमत, नितीशकुमार पुन्हा होणार मुख्यमंत्री

Date:

पाटणाः बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल आज पहाटे ३ वाजता लागला. विधानसभेच्या २४३ जागांपैकी एनडीएने (भाजप-जेडीयू) या निवडणुकीत १२२ जागांचा बहुमताचा जादूई आकडा पार केला असून ३ जागांवर आघाडीवर आहे. तर महाआघाडीला (आरजेडी – काँग्रेस ) निवडणुकीत ११० जागा जिंकता आल्या. यामुळे बिहारमधील सत्तांतराचं काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाचं स्वप्न भंगलं आहे. पण भाजपच्या तोडीसतोड जागा मिळवत आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांना सत्ता मिळाली नसली तरी त्यांचा हा विजयच मानला जातोय.

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी ८ वाजेपासून सुरू झाली. पण करोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीसाठी आयोगाने काही नियम बदलले होते. यामुळे मतमोजणीत उशीर झाला. आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास निवडणुकीचे निकाल हाती आले आणि बिहारमधील एकूण चित्र स्पष्ट झालं.

एनडीएने जिंकलेल्या जागांमध्ये सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्या. भाजपने ७२ जागा तर जेडीयूला ४२ जागा जिंकता आल्या. व्हीआयपी आणि एचएएमचा प्रत्येकी ४ जागांवर विजय झाला. अशा मिळून एनडीएने १२२ जागा जिंकल्या. तर ३ जागांवर एनडीए आघाडीवर आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागांपैकी आरजेडीने सर्वाधिक ७५ जागा जिंकल्या. काँग्रेसने १९ आणि १६ जागा डाव्या पक्षांनी जिंकल्या. महाआघाडीने एकूण ११० जिंकल्याने बहुमत मिळवता आलं नाही. तर एमआयएमने ५ जागा जिंकल्या. तर बसपा, एलजेपी आणि अपक्ष उमेदवाराने प्रत्येकी १ जागा जिंकली. निवडणुकीत तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल हा पक्ष सर्वाधिक ७५ जागा मिळवून सर्वात मोठ पक्ष ठरला आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related