अजित पवारांचे जोरदार ‘कमबॅक’; महिनाभरात पुन्हा उपमुख्यमंत्री

Date:

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार अवघ्या महिनाभरात पुन्हा एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. विधानभवनाच्या प्रांगणात आज झालेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून अजित पवार यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. दरम्यान, अजित पवार यांच्याकडे अत्यंत महत्त्वाचे असे गृहमंत्रिपद सोपवले जाणार असल्याची चर्चा आहे.

अजित पवार चौथ्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. सर्वप्रथम नोव्हेंबर २०१०, त्यानंतर ऑक्टोबर २०१२ आणि त्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये अजित पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. गेल्या महिन्यात जमतेम ८० तासांसाठीच अजित पवार यांच्याकडे हे पद होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करून अजित पवार भाजपसोबत गेले होते आणि २३ नोव्हेंबर रोजी त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या आणि २६ नोव्हेंबर रोजी अजित पवार यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. पाठोपाठ सरकार अल्पमतात आल्याने देवेंद्र फडणवीस यांनाही मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्यानंतर अजित पवार हेच दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. भाजपसोबत सलगी केल्याने अजित पवार यांच्यावर शरद पवार नाराज असल्याचे सांगितले जात होते. ती नाराजी पूर्णपणे दूर करण्यात अजित पवार यांना यश आल्याचेच आता दिसत आहे. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद मिळावे असा पक्षातील बहुतांश आमदारांचा आग्रह होता. तो लक्षात घेऊन शरद पवार यांनी पुन्हा एकदा अजितदादांवर विश्वास टाकला आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या बंडानंतर बरेच तास ‘नॉट रीचेबल’ झालेले धनंजय मुंडे यांनाही मंत्रिमंडळ विस्तारात मानाचे पान देण्यात आले आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार व उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली होती. या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी जो निर्णय घेतला आहे तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. पक्ष त्यांच्यासोबत नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले होते. विशेष म्हणजे अजित पवारांच्या शपथेला उपस्थित राहणारे डॉ. राजेंद्र शिंगणे हे राष्ट्रवादीचे आमदार या पत्रकार परिषदेला हजर राहिले व त्यांनी आम्ही शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे स्पष्ट केले. शिंगणे यांनी दाखवलेल्या या निष्ठेची दखल घेत राष्ट्रवादीकडून शिंगणे यांना कॅबिनेट मंत्रिपदाची बक्षिसी देण्यात आली आहे.

जयंत पाटील नाराज?

बंडानंतर अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदावरून दूर करून ही जबाबदारी जयंत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली होती. ठाकरे सरकारमध्ये उद्धव यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या वतीने शपथ घेणारे जयंत पाटील व छगन भुजबळ हे पहिले दोन मंत्री ठरले होते. दरम्यान, जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशीही चर्चा होती. मात्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदासह मंत्रिमंडळात प्रवेश केल्याने राज्यात राष्ट्रवादीमध्ये अजित पवारच ‘दादा’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घडामोडींमुळे जयंत पाटील काहीसे नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र पाटील यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे. माझ्याकडे पाहून मी नाराज दिसतो का, असा उलट प्रश्न त्यांनी माध्यमांना विचारला.

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Wockhardt Hospitals Introduces Next-gen Robotic Knee Surgery in Nagpur, Empowering Patients to Walk Pain-free Again

MISSO Robotic System brings global orthopaedic technology closer to...

🎉 Black Friday 2025: The Ultimate Guide to Gadget Deals in India

As the holiday season approaches, Black Friday has evolved...

Nagpur Winter 2025: A Season of Chill, Haze & Quiet Magic

As winter unfolds across Nagpur in 2025, the city...

Merry Christmas Wishes 2025

Merry Christmas Wishes 2025 “Wishing you a very merry Christmas...