नागपूर: विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा करत सत्तेत आलेल्या काँग्रेसने Nagpur ZP Election जिल्हा परिषद निवडणकीमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. भाजकडून काँग्रेसने नागपूर जिल्हा परिषद हिसकावून घेतली आहे. काँग्रेसने एकून 58 जागांपैकी 26 जागांवर आपला विजय मिळवला आहे. तर भाजपला अवघ्या 10 जागा राखता आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसने मुसंडी मारत भाजपला भुईसपाट केलं असं म्हणायला हरकत नाही.
नागपूरसह राज्यातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि पालघर या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. मंगळवारी झालेल्या मतदानानंतर बुधवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांना मोठा धक्का बसला आहे. गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत. दरम्यान, सर्वच जिल्हा परिषदांमध्ये आजी-माजी मंत्र्यांसह सर्वपक्षीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
नागपूर जिल्हा परिषद (Nagpur ZP Election) एकूण जागा- 58
काँग्रेस-26
राष्ट्रवादी – 12
भाजप -10
शिवसेना -01
अपक्ष– 01
शेकाप- 01
नागपुरात गड राखण्यासाठी भाजपची तारेवरील कसरत
नागपूर जिल्हा परिषद निवडणूक (Nagpur ZP Election) ही भाजपसाठी अस्तित्वाचा लढाई मानली जात होती. त्याचप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीसाठीही निवडणूक महत्त्वाची आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या 58 गटांसाठी 270 उमेदवार रिंगणात होते. तर 13 पंचायत समित्यांच्या 116 गणांसाठी मतदान झाले. नागपूरमध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 12 पैकी 11 जागा मिळाल्या होत्या, तर फक्त एक जागा काँग्रेसला मिळाली होती. मात्र 2019 मध्ये चित्र पालटलं. काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळून पाच जागा मिळवल्या.
भाजपचा धुव्वा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा गृह जिल्हा असलेल्या नागरपुरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पार पडली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे भाजपचा प्रभाव कमी करण्यासाठी निवडणुका लढत होते. त्यासाठी महाविकास आघाडीने तीन मंत्र्यांना हा भार सोपविला होता. त्यामुळे ही निवडणूक नेत्यांच्या अस्तित्वाची लढाई ठरली आहे. जिल्हा परिषदेच्या 58 सर्कलसाठी 270 तर पंचायत समितीच्या 116 गणासाठी 497 उमेदवार रिंगणात आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षासह गोंडवाना गणतंत्र पार्टी, प्रहार, बहुजन वंचित विकास आघाडी या पक्षाचेही उमेदवार रिंगणात होते.