CoronaVirus In Nagpur: उपराजधानीत ९६ दिवसांत आकडा पोहोचला १००५ वर

Date:

नागपूर : लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेसह सर्वांचीच चिंता वाढली आहे. रविवारी ३६ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांची संख्या १००५ वर पोहचली. विशेष म्हणजे, नागपुरात पहिले १०० रुग्ण गाठण्यास ४४ दिवस लागले तर, ५०० रुग्णांसाठी ८० दिवस लागले, मात्र गेल्या १६ दिवसात ५०० रुग्णांची भर पडली. एकूणच ९६ दिवसात हजार रुग्णांची नोंद झाली.

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) १४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात ११ रुग्ण नाईक तलाव व बांगलादेश येथील आहेत. हे सर्व रुग्ण व्हीएनआयटी येथे क्वारंटाईन होते. या शिवाय जुनी मंगळवारी येथील एक तर डोबीनगर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. सतरंजीपुरा येथील एक गर्भवती महिला पॉझिटिव्ह आली आहे.

खासगी प्रयोगशाळेतून उमरीग्राम येथून एक, जयताळा येथून एक, रिधोरा काटोल येथून एक व तीन नल चौक इतवारी येथून दोन असे पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. माफसू प्रयोगशाळेतून आठवा मैल वाडी येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. हा रुग्ण आमदार निवासात क्वारंटाईन होता. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेतून १६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात एक एसआरपीएफ, दोन एमआयडीसी श्रमिकनगर, सहा नाईक तलाव, एक नरसाळा, एक सावरबांधे ले-आऊट, एक आर्यनगर, एक रामेश्वरी तर एक ब्रह्मपुरी येथील आहे. सावरबांधे ले-आऊट व नरसाळा परिसरात पहिल्यांदाच कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या या ३६ रुग्णांना मेयो, मेडिकल व एम्समध्ये भरती करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

पहिल्या ४४ दिवसात १०० रुग्णाची नोंद

नागपुरात २० दिवसानंतर पहिल्या ५० रुग्णांची नोंद झाली. ४४ दिवसानंतर ही संख्या वाढून १०० वर पोहचली. मात्र त्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली. पुढील १२ दिवसात १०० रुग्णांची भर पडत हा आकडा २२९ वर पोहचला. त्यानंतर सहा दिवसाने ३००, नऊ दिवसाने ४०४, आठ दिवसाने ५०१, पाच दिवसाने ६०२, चार दिवसाने ७०७, तीन दिवसाने ८६२, एक दिवसानंतर ९२१ तर तीन दिवसाने १००५ रुग्ण झाले.

प्रशासनाचे नियोजन यशस्वी

नागपूर उपराजधानीचे शहर असताना, लोकसंख्या व रुग्णसंख्येच्या तुलनेत राज्यात कमी मृत्यूदर असल्याचे पुढे आले आहे. देशात कोरोनाबाधित मृत्यूचा दर २.८० टक्के आहे. महाराष्ट्र चा मृत्यूदर ३.६६ टक्के, विदर्भाचा मृत्यूदर ३.२५ टक्के, तर नागपूरचा मृत्यू दर केवळ १.६ टक्के आहे. रुग्णांचे योग्य व्यवस्थापन, मेयो, मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांसह आवश्यक सोयी सुविधा, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनी केलेले नियोजन आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे हे शक्य होऊ शकले आहे.

मेयोतून आठ रुग्ण घरी परतले

नाईक तलाव येथून तीन, भानखेडा येथून तीन, एक अमरावती रोड तर एक रुग्ण जुनी मंगळवारी येथील आहे. या रुग्णांना पुढील १४ दिवस होम आयसोलेशनमध्ये राहायचे आहे. तसे त्यांनी प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६१५ झाली आहे.

Also Read- नद्यांच्या पुनरुज्जीवनाने नागपूरच्या वैभवात भर

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related