स्वामी विवेकानंद स्मारक येथे दिग्विजय दिन उत्साहात साजरा

Date:

नागपूर : स्वामी विवेकानंदांनी अनेक विपरीत परिस्थितीवर मात करून देशासाठी मौलिक कार्य केले. १२५ वर्षापूर्वी त्यांनी उद्गारलेले शब्द आजही जगासाठी आदर्श आहेत. स्वामी विवेकानंद यांचे जीवन आनंद देणारे आहे. त्या जीवनाचा अभ्यास करून ते आत्मसात करा, असे आवाहन ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केले.

११ सप्टेंबर १८९३ ला शिकागो येथे जागतिक धर्म परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या भाषणाला १२५ वर्ष पूर्ण झाली. त्याप्रित्यर्थ नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण समितीतर्फे अंबाझरी येथील स्वामी विवेकानंद स्मारक येथे दिग्विजय दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी होते. विशेष अतिथी म्हणून दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजीत तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, नेहरू नगर झोन सभापती रिता मुळे, नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी म्हणाले, शिकागोला जागतिक धर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करायला जाताना स्वामी विवेकानंद यांना अनेक विपरित परिस्थितीचा सामना करावा लागला होता. अनेकांनी त्यांच्या कपड्यांवर व वयावर त्यांची हेटाळणी केली. मात्र विवेकानंदांनी शांतपणे प्रत्येकाला प्रभावीपणे उत्तर देउन छाप सोडली. जागतिक धर्म परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी लागणारे पत्रही नसल्याने स्वामी विवेकानंद यांना एकाने पत्राच्या बदल्यात ‘आम्ही सांगितेलेलेच विचार मांडा’, असे सांगितले. मात्र पत्रासाठी विचारांची गुलामगिरी करणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगतिले होते, असे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी म्हणाले.

स्वामी विवेकानंद चर्चा उत्तम करायचे मात्र त्यांनी कधी भाषण दिले नव्हते. पहिल्यांदा शिकागोमध्ये जागतिक धर्म परिषदेमध्ये ते भाषणासाठी उभे झाले. सुरूवातीला त्यांनी आपले नाव पुढे ढकलले. मात्र जेव्हा ते बोलले तेव्हा कुणीच बोलू शकले नाही. स्वामी विवेकानंद यांनी परिषदेमध्ये हिंदू धर्माची जी परिभाषा मांडली, भारतीय संस्कृतीची जागतिक स्तरावर जी मांडणी केली. त्यामुळे जगात खिश्चन धर्मापेक्षाही इतर धर्म आहेत, अशी जाणीव त्यांनी करून दिली. स्वामी विवेकानंदांनी सर्वसमावेशक देशाची संकल्पना मांडली. मात्र आज एवढ्या वर्षानंतरही आपण ती आत्मसात करू शकलो नाही, अशी खंतही ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी मांडली. स्वामी विवेकानंद यांनी युवकांच्या ओठावर जे गाणे येईल, ते त्या देशाचे भवितव्य असेल, असे त्यावेळी बोलले होते. मात्र आज आपल्या युवकांच्या ओठांवरील गाण्यांमुळे देशाच्या भविष्याची चिंता वाटते. देशाचे भविष्य वाटावे असे गाणे युवकांच्या ओठावर यावे यासाठी प्रयत्न सुरू करा, असे आवाहनही दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केले.

स्वामी विवेकानंदांना अपेक्षित भारतासाठी संकल्प करा : श्रीपाद अपराजीत

अमेरिकेतील शिकागोमध्ये झालेल्या जागतिक धर्म परिषदेमध्ये भाषणाची सुरूवात करताना स्वामी विवेकानंद यांनी ‘माय अमेरिकन स्टिस्टर्स अँड ब्रदर्स’ अशी केली. १२५ वर्षापूर्वीही स्वामी विवेकानंदांनी महिलांना प्राध्यान्य दिले ही बाब आज आदर्श ठरावी. ‘अन्य धर्मांपेक्षा श्रेष्ठ असा माझा धर्म नाही, मात्र सर्वांना सोबत घेउन चालणारा माझा धर्म आहे’ असे ते त्यावेळी ते अभिमानाने म्हणाले होते. माणसांना दूर लोटणा-या धर्माला लाथाडत देशाला धर्मापेक्षा भाकरीची जास्त गरज आहे, असे स्वामी विवेकानंद म्हणायचे. उपाशी असलेल्यांना रोजी-रोटी देणे हा खरा धर्म आहे. देशातील कुणीही उपाशी राहू नये व उपाशीला धर्म सांगू नये. असा भारत स्वामी विवेकानंद यांना अपेक्षित होता. स्वामींच्या संकल्पनेतील भारत निर्माण करण्यासाठी सर्वांनी संकल्प करा, असे आवाहन दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजीत यांनी यावेळी केले. ३९ वर्ष आयुष्य लाभलेल्या स्वामी विवेकानंद यांच्यासाठी १२५ वर्षानंतरही टाळ्या पडतात हा त्यांच्या जीवनाचा मोठेपणा आहे. त्यांचे विचार आज आत्मसात करण्याची खरी गरज आहे, असेही ते म्हणाले.

अधिक वाचा : गणेश विसर्जन साठी मनपा यंत्रणा सज्ज ठेवा!

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related